मुंबई - राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुपारपासून मागे घेत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीने आज मंत्रालयात जाहीर केले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितले, की दुपारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून, लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले आहे. त्यानुसार आणि मराठा आरक्षणासाठी असलेला "बंद' आणि रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून संप मागे घेत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून राजपत्रित अधिकारी वगळता इतर कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता. यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव जैन यांच्याबरोबर बैठकांचे सत्र पार पडले होते. मात्र, आपल्या मागण्यांवर संघटना पदाधिकारी ठाम असल्याने ही बोलणी निष्फळ ठरली होती. मात्र, आज मुख्य सचिव जैन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर दुपारी संघटनांनी हा संप मागे घेत असल्याची घोषणा केली. निवृत्तिवेतन जुन्या पद्धतीने देणे. अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती आदी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
|