भारत होणार जागतिकीकरणाचे इंजिन

भारत होणार जागतिकीकरणाचे इंजिन

जागतिकीकरणाचे इंजिन म्हणून भारत नावारूपाला येत अाहे. शाश्वत जागतिकीकरणाचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे नेण्यास भारत मोठे बळ देईल, हे निश्चित.
 

टीसीएस, इन्फोसिससारख्या आयटी कंपन्यांना आऊटसोर्सिंगमार्फत जागतिकीकरणाचा लाभ झाला़. पण, तीस वर्षांपूर्वी बर्लिन भिंत पडल्यावर जगभर वाहू लागलेले जागतिकीकरणाचे वारे दहा वर्षांपासून मंदावलेले दिसत आहेत. त्या दृष्टीने हे वर्षही कठीण जाणार आहे. मात्र, चीन व भारत जागतिकीकरणास बळ देणारे मुख्य घटक ठरतील. चीनबाबत असे भाकीत दहा वर्षांपूर्वी कोणी केले नसते. पण, बदल हवा असलेले भारतातील उच्चशिक्षित तरुण, चांगल्या संधीसाठी परतणारे अनिवासी भारतीय यामुळे भारतालाही चांगली संधी आहे.

अमेरिकेत सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांना युरोप, चीन आदींबरोबरच्या व्यापारी करारांचा फेरविचार करायचा आहे. त्यांना नेमका कसा बदल हवाय, हे कळत नाहीये. त्यामुळे अमेरिका जागतिकीकरणाचा केंद्रबिंदू राहणार नाही. लवकरच फ्रान्स, जर्मनी, हॉलंड व काही आशियायी देशांमध्येही लोकानुयायी नेते सत्तेवर येण्याची शक्यता आहे. माझ्या देशाचा विचार आधी, नंतर जगाचा विचार, हे त्यांचे तत्त्व असल्याने या वर्षात जागतिकीकरणाच्या भवितव्याबाबत काहीच भाकीत करता येत नाही. अशा स्थितीत तीन शक्यता दिसून येतात, एक म्हणजे ट्रम्प चीनला व्यापारीदृष्ट्याही शत्रू मानत असल्याने जागतिकीकरणाची पीछेहाट होईल किंवा जागतिकीकरणाचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईल. यात चीन व भारत सिंहाचा वाटा उचलतील किंवा तिसरी शक्यता म्हणजे जागतिकीकरणाचा प्रवाह आहे तसाच शाश्वत सुरू राहील. जागतिकीकरणाच्या पीछेहाटीची शक्यता पन्नास टक्के आहे. मात्र, ते न होता शाश्वत जागतिकीकरणाचा लाभ सर्वांनाच मिळेल, असेच पाहिले पाहिजे. त्यासाठी त्या त्या देशांमध्ये सुसंवाद तसेच प्रक्रियेत सकारात्मक सहभाग हवा. त्या दृष्टीने आशियातील सार्क, आसियान अशा संघटना महत्त्वाच्या ठरतील.

टाटा तसेच आयटी कंपन्यांची कामगिरी सोडली तर भारत सध्या जागतिकीकरणातील महत्त्वाचा घटक नाही. तरीही लवकरच भारत या प्रक्रियेला मोठे बळ देईल, असे दिसते. हे सुचिन्ह आहे. उच्चशिक्षित व बदलाची आस घेतलेले तरुण व अनिवासी भारतीय यास कारणीभूत ठरतील. अनिवासी भारतीय देशप्रेमापोटी नाहीत तर चांगल्या मोठ्या संधींसाठी परत येतील, हेदेखील ध्यानात घ्यावे लागेल. पूर्वी भारतीय उद्योगक्षेत्र हे काही कुटुंबांपुरतेच मर्यादित होते. मात्र, आता अनेक बुद्धिमान तरुण उद्योगक्षेत्रात झेप घेत आहेत. दोन वर्षांपासून पंतप्रधानांच्या धोरणांमुळेही वातावरण अनुकूल होत आहे. निश्चलनीकरणाचा निर्णय हे अत्यंत धाडसी पाऊल असून, आता त्यावर टीका होत असली तरी त्याचा दीर्घकालीन फायदाच होईल.

भारतीय उद्योग आता देशाबाहेर विस्तारू लागले आहेत. त्यांनी अशाच प्रकारे जागतिकीकरणाचे भागीदार झाले पाहिजे. परदेशात भागीदार शोधून तेथे गुंतवणूक केली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे बदल घडावा यासाठी नेत्यांची वाट पाहू नका. ही जबाबदारी सर्वांवर आहे. स्वतःपासून, आपल्या परिसरातून, आपल्या उद्योगातून सुरुवात केली तर आपला मार्ग निश्चितच सुकर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com