जळगाव - शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे अजित पवार म्हणतात, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे; परंतु पवारांना किती तोंडे आहेत. उपमुख्यमंत्री असताना ज्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांबाबत अहवेलना करणारे शब्द उच्चारले ते तोंड आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविण्यास गप्प आहे. कारण त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लगावला.
उद्धव ठाकरे बुधवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. धरणगाव येथील सभेत ते म्हणाले, 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आम्ही सत्त्तेत असून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवित असल्यामुळे अजित पवार यांनी आमची अहवेलना केली आहे. त्यांनी शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे म्हटले आहे, मात्र त्यांना किती तोंडे आहेत हे त्यांनीच पाहावे. सत्ताधाऱ्यांविरुद्ध त्यांनी आवाज उठवायला पाहिजे मात्र त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबलेला असल्यामुळे ते गप्प आहेत.''
विखेंवर टीका
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, 'विरोधी पक्षनेता असतानाही सरकार आपल्याला घरच्यासारखे वाटते, असे ते म्हणतात. सरकारला आपले म्हणणारे हे कसले आले विरोधी पक्षनेते. भाजप सरकारशी त्यांचे साटेलोटे आहे. शिवसेना मात्र अशा पद्धतीचे राजकारण चालू देणार नाही.'' या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार नीलम गोऱ्हे, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.
बॅंकांना "शिवसेना स्टाईल'
राज्य सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सरकार कर्जमुक्तीसाठी जून 2016 पर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ देत आहे. त्यांनी वाढवून 2017 करावी, अशी आमची मागणी असून शिवसेना त्याच्यावर ठाम आहे. कोणत्याही परस्थितीत कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांना प्रत्येक बॅंकेने कर्ज दिले पाहिजे, ज्या बॅंका शेतकऱ्यांना नडतील त्यांना "शिवसेना स्टाईल' दाखविण्यात येईल. शिवसैनिकांनी आता बॅंकांसमोर टेबल खुर्ची टाकून बसावे, असा आदेशही त्यांनी दिला आहे.
|