महापूजा मुख्यमंत्र्यांविना

महापूजा मुख्यमंत्र्यांविना

मुंबई -  मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. 

वारीमध्ये काही संघटनांचा चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा डाव होता, असा दावाही त्यांनी या वेळी केला.मराठा आरक्षणासंदर्भात केवळ उच्च न्यायालयच निर्णय घेऊ शकते. हे काही संघटनांना माहीत असूनसुद्धा त्या राजकीय आकसापोटी समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. वारीत दगडफेक घडवून आणण्याचा डावही आखण्यात आला होता. अशा प्रकारची हिंसक कामे करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. ‘‘महाराष्ट्रात वारीची परंपरा ही आठशे वर्षांपासून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही वारीला संरक्षण दिले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा करावी ही परंपरा आहे. ही पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, मी ती पोलिस संरक्षणातही करू शकतो. परंतु, यातून वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल म्हणून आपण पूजा न करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजेची पंरपरा खंडित होणं योग्य नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

यांनाही पूजेला मुकावे लागले होते
युती सरकारच्या काळात १९९७ मध्ये रमाबाई आंबेडकरनगरमधील गोळीबाराच्या घटनेवरून दलित संघटनांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना आषाढीच्या पूजेला विरोध केला होता. त्यामुळे त्यांनाही महापूजा करता आली नव्हती. त्यानंतर आर. आर. पाटील हे उपमुख्यमंत्री असताना त्यांना डाऊ आंदोलनाच्या कारणावरून कार्तिकीची शासकीय महापूजा करता आली नव्हती. अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनाही त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे कार्तिकीच्या शासकीय महापूजेला न येण्याचा निर्णय घ्यावा 
लागला होता.

सोलापूर, मुंबईत आंदोलन
सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, माढा, इंदापूर भागांत एसटीवर दगडफेकीच्या घटना घडल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतदेखील विविध ठिकाणी  ठिय्या आंदोलन केले. नवी मुंबई व ठाण्यात दोन दिवसांपासून ठिय्या सुरू आहे. 

युवकांचे अर्धनग्न आंदोलन 
बीड ः परळी येथून सुरू झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा म्हणून पाटोदा येथील तहसील कार्यालय परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच असून,  रविवारी युवकांनी अर्धनग्न आंदोलन केले.

राज्यभरात मराठा आंदोलनाची दिशा बदलली असून, याला सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. यापुढे चिघळणाऱ्या आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील. 
- नारायण राणे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com