ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम

Farmers strike
Farmers strike

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसान क्रांती मोर्चातील सदस्यांमध्ये आज पहाटेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र, त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील व्यवहार अद्याप बंदच आहेत. किसान क्रांती मोर्चातील मोजक्याच सदस्यांनी संप मागे घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. संप मागे घेताना विश्वासात न घेतल्याचेही विविध शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

शेतकरी संघटनांनी सोमवारी (ता. 5 जून) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्या बंदबाबतही आता संभ्रम निर्माण झाला आहे. 

किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह विविध शेतकरी संघटनांनी किसान क्रांतीने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला. संपाबाबत निर्णय घेताना सर्वांना सामावून घेऊन अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मोजकेच लोक गेले होते. या बैठकीत झालेले निर्णय बैठकीत सहभागी झालेल्यांनी येथे येऊन सांगायला हवे होते, असे काही संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे स्पष्ट चित्र आहे. ज्या कोअर समितीसोबत चर्चा घडवून आणली, ती कोअर समिती शेतकरी आंदोलकांची नसून, ती तथाकथित व शासनाची स्वयंम घोषित समिती होती, असाही आरोप करण्यात येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे खासदार राजू शेट्टी म्हणाले, की किसान क्रांतीने संपाबाबत निर्णय घेण्याबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे संप मिटल्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्हाला विश्वासात घेतले गेलेले नाही. सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेली आश्वासने आम्हाला मान्य नाही. आंदोलनकर्ते सरकारच्या दबावाला बळी पडले.

शेतकऱ्यांचा एक गट संपावर ठाम
पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असताना शेतकऱ्यांचा दुसरा गट सक्रीय होऊ पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तर टक्के मागण्या मान्य केल्या असल्या तरी प्रत्यक्षात तातडीने कर्ज माफी मिळत नसल्याने आंदोलन सुरू ठेवण्याच्या मानसिकतेत काही शेतकरी आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पांढरीपूल येथे आज सकाळी शेकऱ्यांनी रस्त्यात दूध ओतून आंदोलन केले.

सेलू शहर बंद
शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून सेलू शहर बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला. शहरात आज (शनिवार) कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 
शहरातील आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आला आहे.

परभणीत रस्त्यावर फेकला भाजीपाला
परभणी-गंगाखेड राज्य रस्त्यावरील ब्राह्मणगाव (ता. परभणी) येथे शनिवारी सकाळी सहा वाजता पाच ट्रकची तोडफोड करण्यात आली. ट्रकमधील भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला.

साताऱ्यात व्यवहार बंद
शेतकरी संपाबाबत संभ्रम कायम असला तरी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सुरू झालेले नाहीत. आज जैसे थे परिस्थिती राहील असे व्यापारी सांगतात. रविवारी बाजाराचा दिवस असल्याने व्यवहार सुरळीत होतील असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com