मुंबई - एकीकडे विरोधक मराठा आंदोलन चिघळण्यास राज्य सरकारला जबाबदार धरत असताना, आता मंत्रीही विरोधकांकडे बोट दाखवताना दिसत आहेत. शिक्षणमंत्री आणि सरकारच्या मराठा उपसमितीतील विनोद तावडे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील आंदोलन काही मराठा नेत्यांनी बदनाम केल्याचा आरोप केला. मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना आता आंदोलनानंतर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तावडे म्हणाले, की मराठा आंदोलन नेमके कुणी बदनाम केले, हे आता पोलिसांना समजले आहे. आपण त्या वेळी मराठा समाजाला काही देऊ शकलो नाही. त्याचे कदाचित काही नेत्यांना वाईट वाटले असावे, त्यामुळे काही मराठा नेत्यांनी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे आता हळूहळू समोर येत आहे. मात्र, आमचे सरकार हे मराठ्यांना आरक्षण देणार आणि तेही न्यायालयात टिकणारे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिपत्रक काढून राज्य सरकारने मराठा आंदोलनाची दखल न घेतल्यानेच उद्रेक झाल्याचे म्हटले होते. राज्यात परिस्थिती चिघळण्यास सरकार आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री याबाबत चिथावणीखोर वक्तव्य देत असल्याचेही पवारांनी पत्रकात म्हटले होते.
|