‘लाँग मार्च’ने सरकारला जाग!; मोर्चा आझाद मैदानात

Farmer Long-March
Farmer Long-March

मुंबई - शेतकरी मोर्चाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच, संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकार सोमवारी मान्य करणार असल्याचे समजते. गेल्या वेळेप्रमाणेच आताही शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा यशस्वी सामना करण्याची फडणवीस नीती सरकारने आखल्याचे संकेत आहेत. दरम्यान, परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हजारो शेतकऱ्यांनी मध्यरात्री पायपीट करत आझाद मैदान गाठले.  

महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल करत रविवारी मुंबईतील सायन येथे पोचलेला शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ सोमवारी आझाद मैदानावर धडकला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी विधान भवनात चर्चा करतील. त्या वेळी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याबाबतचे लेखी निवेदन सरकारकडून विधिमंडळात करण्यात येणार असल्याचे समजते. विधानसभा सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर हे निवेदन सरकार सभागृहात करणार आहे.

दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी मोर्चाला सामोरे जाऊन मोर्चेकऱ्यांना सरकारशी चर्चेचे निमंत्रण दिले. अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट यांनीही विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे मोर्चाचे नेते अशोक ढवळे, अजित नवले यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांनी कन्नमवार येथे जाऊन मोर्चाल शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसेने या मोर्चास यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांना रविवारी रात्रीच आझाद मैदानाकडे जाण्याचे आवाहन पोलिसांनी केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यास दुजोरा मिळालेला नाही. 

बोंड अळीच्या भरपाईबाबत निर्णयाचीही चिन्हे
नाशिक जिल्ह्यातील नारपार-पिरपांजाळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देता यावे, यासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे घालण्यात येणार आहे; तर बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबतही सोमवारी ठोस निर्णय होण्याची शक्‍यता आहे. वैयक्‍तिक लाभाच्या सामाजिक योजनांबाबतही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सकारात्मक निर्णय घेणार आहेत.  

वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रांवर जा !
शेतकरी मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वीत परीक्षा केद्रांवर पोचावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com