विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांची मध्यरात्री पायपीट

kisan long march
kisan long march

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज (सोमवार) पहाटे एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे पाचच्या सुमारास आझाद मैदान गाठले.

#KisanLongMarch #आक्रोश_बळीराजाचा

दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. मोर्चामुळं विद्यार्थांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच मोर्चेकरी आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला होता. त्यानुसार हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र बहुतांश मोर्चेकरी पायीच आझाद मैदानाकडे निघाले. अखेर रात्री तीन ते चार तास पायपीट करत या शेतकरी आंदोलकांनी आझाद मैदान गाठले.

2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याचीत्वरित अंमलबजावणी करावी, यासहीत अन्य मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीने नाशिकहून हजारे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केलेला लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला होता. हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे लक्षवेधी ठरलेल्या या मोर्चाला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता. तर हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर सत्ताधारी भाजपाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे मोर्चेकऱ्यांना भेटले होते. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून उद्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार आहे. त्यावेळी विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहतील असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते.

कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया, शेतीमालाला दीडपट भावाची हमी दया, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी दया, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई दया, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लॉंग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला डबेवाल्यांचा पाठिंबा
बळीराजाच्या लाँग मार्चचा आजचा सातवा दिवस आहे. रणरणत्या उन्हात आणि भीषण विषम परीस्थितीतही शेतकरी हजारोंच्या संख्येने आपल्या मागण्या शासन दरबारी मंजूर करून घेण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत मुंबई मुक्कामी आले आहेत. अनेकांना प्रवासात लहानमोठ्या दुखापती झाल्या आहेत. फडणवीस सरकारने निवडणूकीदरम्यान दिलेल्या अश्वासनांची पुर्ती अद्याप केली नसून,शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात असंवेदनशिलता दाखविली आहे. आम्ही डबेवाल्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू शकू असे आम्हाला वाटते शेतकरी लाँग मार्चला पाठिंबा दर्शविताना डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर सोमय्या ग्राऊंडवर हजारो शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com