मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात निधी मिळेल असे वाटले होते. मात्र, सरकारने कोणत्याच घटकाला योग्य निधी दिला नसल्याचा आरोप करत, अर्थसंकल्प म्हणजेच आश्वासनांचे बुडबुडे दिसून येत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी बुधवारी विधान सभेत केली. अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते.
पवार म्हणाले, की कर्नाटकने स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर केला, त्याच धर्तीवर राज्यानेही स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला असता, तर कृषी खात्याचा फायदा झाला असता. अर्थमंत्री म्हणतात, राज्य योग्य दिशेने चालले आहे; पण राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज होणार असून, त्यास राज्य सरकारचे निर्णयच जबाबदार राहणार आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे; मात्र राज्याला हवा तसा निधी मिळत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याअंतर्गत सिंचन विभाग येतो. ते म्हणाले, की सिंचनासाठी निधी कमी पडू देणार नाही, सरकारने केंद्राकडे मागणी करावी. गडकरी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.
|