मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल. काही जुन्या मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 21) 'सकाळ'ला दिली.
मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करताना त्यांना चांगले खाते देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला टोले लगावले. राज्य सरकारला 31 ऑक्टोबरला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी अनौपचारिक चर्चा करताना मुख्यमंत्री बोलत होते.
उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध; मात्र शिवसेना स्वतःच संपणार
शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेमुळे राज्य सरकार अस्थिर आहे का? आणि भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन घेणार का, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थनाबाबत अनेक अफवा आहेत. उलटसुलट राजकीय चर्चाही अधूनमधून होतात. त्यात काडीमात्र तथ्य नाही. राष्ट्रवादीचे समर्थन घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चाही नाही.
ते स्वतःच संपतील!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत; मात्र पक्ष म्हणनू शिवसेनेची भूमिका योग्य नाही. शिवसेनेला सत्तेत राहून सत्ताधारी आणि विरोधक अशी दुहेरी भूमिका बजावायची असल्याने त्या पक्षाचे राजकीय नुकसान होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नांदेड आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले, नांदेडमध्ये आमच्या मतांची टक्केवारी वाढली आणि शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षभरात झालेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे मोठे नुकसान झाले, त्याला त्यांची दुटप्पी भूमिका कारणीभूत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. शिवसेनेबद्दल ते म्हणाले, त्यांना कुणी संपवायची गरजच नाही, तर ते स्वतःच संपणार आहेत.
गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, ''एका पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपची पीछेहाट होत असल्याच्या चर्चा निष्फळ आहेत. गुरुदासपूरबरोबर झालेल्या मणिपूरधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे.''
समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन होणारच
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणारच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गासाठी 60 टक्के शेतकऱ्यांनी समंती दिली आहे. 50 टक्के जमीन नोव्हेंबरअखेरपर्यंत संपादित करण्यात येईल. उर्वरित जमीन डिसेंबर अखेरपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहे. महामार्गाचे काम जानेवारी 2018 मध्ये सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा होणार आहे. तो कसा हे लोकांना पटवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.