पंतप्रधान नरेंद्र मोदी थापाडे: राज ठाकरे

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई : 'हगलेलं तरंगत' ही आपल्याकडे गावरान म्हण आहे. कितीही खोटं बोलला तरी ते पुढे येणार आहे. सोशल मिडीयात काही लपून राहत नाही. सोशल मिडीया अंगाशी येत असलेले पाहून अमित शहा म्हणत आहेत सोशल मिडीयावर विश्वास ठेवू नका. अनेक भक्तांच्या पट्ट्या निघाल्या आहेत. मोदींची निव्वळ थापेबाजी सुरु आहे, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. 

मुंबई रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमातही उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमात अजित भुरे यांनी राज ठाकरेंवर लिहिलेल्या लेखातील काही मुद्दे वाचून दाखविले.

राज ठाकरे म्हणाले, ''सोशल मिडीयाचा वापर 2009 पासून सुरु झाला. फेसबुक पेजवर खरे असेल हे ठरवून मी येथे आलो आहे. मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर 48 टक्के फॉलोअर्स फेक आहेत. त्यावर कोणतेही आकडे फुगवलेले नसतील. मोदी नेपाळमध्ये गेले असताना एका नागरिकाने त्यांना सांगितले माझे नाव थापा तर त्यावर मोदी म्हणाले मला थापाडे म्हणतात. नुसती भाषणे किती काळ ऐकायची. काहीतरी होईल अशी अपेक्षा होती. आतापर्यंत नुसती भाषणचं ऐकत आलोय. मेक इन इंडियावर कोणी बोलायलाच तयार नाही. निवडणुकीपूर्वी देशभरातून लोखंड जमा केले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी, कुठायं आता तो पुतळा. नोटाबंदीचे तसेच झाले. रिझर्व्ह बँकेने सांगितले 99 टक्के पैसे परत आले. मगं काळा पैसा कुठे गेला. परदेशातील काळा पैसा आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असे म्हटले होते. पण, या सगळ्या थापाच निघाल्या. या भाजपनेच म्हटले होते, देशातील 65 टक्के नागरिकांचे बँकेत खातेच नाही. मग तुम्हाला कळले नाही का नोटाबंदी करताना. अजून वेळ गेलेली नाही. पण, या गोष्टींची सवय झाली की तसेच वागायला सुरवात होते. मध्येच कुठेतरी योगा काढायचा आणि झाले मग सुरु स्वच्छ भारत. त्यानंतर आता नवीन काहीतरी काढायचं. आता फुटबॉल सुरु केले आहे. तुम्ही त्या सिंधुदुर्गचा फुटबॉल करून ठेवला. भारत स्वच्छ करण्यापूर्वी महानगरपालिका, राज्य सरकार स्वच्छ करायला घ्या. काँग्रेसच्या आणि आताच्या काळात काय फरक पडला सांगा. साडेतीन वर्षांत नोटेचा रंग बदलल्याशिवाय काही झाले नाही. बुलेट ट्रेनविषय़ी पहिल्यांदा बोलणारा मी होतो. तुम्ही मुंबई-दिली, मुंबई-कोलकता करायला हवी होती. अहमदाबादला जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा येथे चांगले ढोकळे मिळतात. मुंबई आमची आहे आणि राहणाराच. मुंबई गुजरातला जोडण्याचे जुने स्वप्न आहे, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. मुंबई मेट्रोपण त्यासाठी सुरुच केली. मराठी माणसाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे. मराठी माणसाला नख लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालू. भाजपमधील मराठी नेते हुजरे आहेत.''

शेतकरी गळफास घेऊन मरत असताना बुलटे ट्रेनने प्रवास कमी झाला पाहिजे, हे कशासाठी. फेसबुक पेज विरोध करण्यासाठी नाही, तर चुकीचे ते चुकीचे आणि चांगले ते चांगले सांगण्यासाठी. सत्ताधाऱ्यांचे अभिनंदनही करेल आणि चाबूक काढायला मागे पुढे बघणार नाही. जपानच्या पंतप्रधानांना गुजरातच्या प्रचारासाठी वापरण्यात येत आहे, हे त्यांना तिकडे गेल्यावर कळले, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 

दाऊदलाच यायचंय भारतात - राज ठाकरे
दाऊद इब्राहिमला स्वतः भारतात यायचे आहे. त्यामुळे तो केंद्र सरकारबरोबर बोलणे करत आहे. भाजपवाले आता हेच सांगणार बघा आम्ही दाऊदला आणले. काँग्रेसला आतापर्यंत जमले नाही आम्ही केले. चीनचे सैन्य पण फक्त डोकलाममध्येच आले. तेही गेले परत आणि आम्हीही आलो परत, सगळे ठरलेल होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महिन्यातून एकदा 'फेसबुक लाईव्ह' करणार
सोशल मिडीया हे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रभावी माध्यम असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) धोरणे लोकांपर्यंत मांडण्यासाठी फेसबुक पेजचा वापर करणार आहे. त्यामुळे दर महिन्यातून मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com