उद्धव, गप्प बसा! - राणे

उद्धव, गप्प बसा! - राणे

सांगली - काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपशी घरोबा करणाऱ्या नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना त्यांचा कटकारस्थानी असा उल्लेख केला. बाळासाहेबांना मी शेवटच्या काळात वेदना दिल्याचे सांगून ते सहानुभूती मिळवत आहेत. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे की जास्तीचे बोलाल तर तुम्ही शेवटच्या काळात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी त्यांना दिलेल्या अनंत त्रास वेदना जगजाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला. 

श्री. राणे त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बांधणीसाठी सध्या पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. सांगलीत त्यांनी पक्षाचा अजेंडा ‘सर्वधर्मसमभाव’च असेल, असे जाहीर केले.

श्री. राणे यांनी आज सकाळी वसंतदादांच्या समाधीस्थळी भेट घेऊन जिल्ह्यातील निवडक कार्यकर्त्यांशी येथील विश्रामगृहावर संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘इकडे काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आले होते. ते काय बोलतात ते त्यांना कळते तरी का? कोल्हापुरात ठाकरे म्हणाले, सत्ता द्या. सीमाप्रश्‍न सोडवतो. 

मग सध्या ते कोठे आहेत? सहा आमदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांना सांगतात, शंभर टक्के सत्ता द्या, मंत्रिपद देतो. त्यांनी देसाई, रावते, कदम या पडेल लोकांना मंत्रिपदे दिली. कर्जमाफी न दिल्यास सत्तेतून बाहेर पडण्याची त्यांनी पाचपन्नास वेळा धमकी दिली आहे. त्याचवेळी त्यांचे मंत्री मात्र मूग गिळून गप्प बसतात. त्यांना लोकांच्या प्रश्‍नाची काडीची माहिती नाही. शिवसेनेनं सत्ता उपभोगली; पण जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत. मी शिवसेना सोडली ते उद्धव ठाकरे यांच्या द्वेषबुद्धीला कंटाळून. ते आता बाळासाहेबांना मी त्रास दिल्याचे सांगतात. मात्र, मी नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना त्रास दिला आहे.’’ 

लांबणीवर पडलेल्या मंत्रिपदाबाबत श्री. राणे म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या विरोधामुळे माझे मंत्रिपद थांबलेले नाही. कारण एवढी काय त्यांची ताकद नाही. काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीतून ते दिसून आलेच आहे. त्यांच्या मदतीविनाही लाड जिंकलेच असते. कदाचित सध्या गुजरातमधील परिस्थिती योग्य नाही, म्हणून भाजपकडून थांबले असावे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर माझा विश्‍वास आहे. सध्या शिवसेनेचा देवेंद्र यांना व्यत्यय आहे. तो सहन करून सरकार चालविले जात आहे. लवकरच सुधारणा होईल. सध्या मी पक्ष म्हणून एनडीए सोबत आहे. भविष्यात भाजपमध्ये विलीन व्हायचे किंवा नाही, याबाबत विचार केलेला नाही. मात्र, मी सध्या पक्षबांधणीवर भर दिला आहे.’’

भाजपने फसवणूक केली असे वाटते का? असे विचारता ते म्हणाले, ‘‘माझी कोणीच फसवणूक करू शकत नाही. चंद्रकांत पाटील किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर माझा विश्‍वास आहे. अपमान सहन करून मी कुठेच थांबत नाही. आणि मला कधीच कोठे तशी वागणूक मिळाली नाही. काँग्रेसने मला १३ वर्षे सतत मुख्यमंत्री करतो म्हणूनच सांगितले. मात्र, त्यांनी शब्द पाळला नाही. अपमान होतो तिथे मी थांबत नाही. मला कोणत्याही पक्षामध्ये अपमानाची वागणूक मिळाली नाही, प्रत्येक ठिकाणी मी स्वाभिमान सांभाळून होतो. राणे काय ताकद आहे ते कळले आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. गुजरातचा पहिला टप्पा पार पडला आहे. पुढच्या टप्प्यात माझा नक्की विचार होईल. चुरस असली तरी गुजरात भाजपच जिंकेल, असे मला वाटते.’’

एरवी आक्रमक वक्तव्ये करणाऱ्या राणे यांनी आज मात्र महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची दृष्टी घेऊन या सरकारने पुढे जायला हवे, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला दिला. सांगलीत गेल्या काही दिवसांत झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘‘शिक्षण, पायाभूत सुविधांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांतील सरकारच्या कारभाराबाबत उद्योजक-शेतकरी नाराज आहेत, असा समज पसरवणारेच सत्तेत बसले आहेत. त्यामुळे सरकारला उर्वरित दोन वर्षांत गतिमान करण्यासाठी मला सत्तेत जायचे आहे. सर्वपक्षीय नेते फक्त एकमेकांचे उणेदुणे काढत आहेत. सत्ता असेल तरच सारे प्रश्‍न सोडवता येतात. त्यामुळे मी सरकारसोबत राहूनच सारी कामे करून घेणार आहे. आमचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेऊन पुढे जात आहे. मराठा, धनगर आरक्षण हा आमचा अजेंडा आहे. तसाच दलित-आदिवासी यांचे आर्थिक जीवनमान मुख्य प्रवाहाबरोबर आणावे लागेल. कालच आम्ही पक्षाचे दिशा धोरण जाहीर केले आहे. आता आमचा पक्ष सर्व जाती धर्मासाठी आहे. तशीच आमची घटना बनवली आहे.’’

भाजपमध्ये ज्योतिष वाढलेत
तुमचे मंत्रिपद लांबणीवर का पडलेय, या प्रश्‍नावर राणे म्हणाले, ‘‘भाजपला कोणा ज्योतिषाने सल्ला दिला आहे की सध्या योग बरा नाही. गुजरात निवडणुकीनंतर तो योग असेल, असेही त्यांनी सांगितले आहे. सध्या भाजपमध्ये ज्योतिषांची संख्या वाढली आहे.’’

राणे म्हणाले...
वर्षापूर्वी मला शिवसेनेकडूनही ऑफर होती.
आता मी पुन्हा शिवसेनेत जाणार नाही.
उद्धव यांनी कदम, देसाई, रावते अशा लोकांना मंत्री केलेय.
काँग्रेसने तीनवेळा मुख्यमंत्रिपदाबाबत फसवणूक केली. 
प्रादेशिक पक्षाचे भवितव्य नेतृत्वावर ठरेल.
सांगली महापालिका निवडणुकीसाठी योग्य वेळी पक्षाचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com