"ई नाम'मध्ये कसूर करणाऱ्यांवर कारवाई 

"ई नाम'मध्ये कसूर करणाऱ्यांवर कारवाई 

पुणे - राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम)च्या अंमलबजावणीविषयी राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. योजनेची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी राज्यातील विविध बाजार समितींच्या उपस्थित संचालक आणि अधिकाऱ्यांना दिला. 

केंद्र सरकारने "ई नाम' ही योजना आखली आहे. या योजनेत राज्यातील 60 बाजार समितींचा समावेश केला आहे. पहिल्या टप्प्यातील तीस बाजार समितींना प्रत्येकी तीस लाख रुपयांचे अनुदानही दिले गेले आहे. उर्वरित तीस बाजार समितींना लवकरच अनुदान मिळणार आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी पणन आणि सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी, बाजार समितींचे सचिव, प्रशासकीय मंडळातील सदस्य आणि संचालक यांची बुधवारी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीच्या सुरवातीला पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी ई नाम योजनेच्या अंमलबजावणीतील वस्तुस्थिती मांडली. 

मंत्री देशमुख यांनी योजनेच्या अंमलबजावणीत गती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य झाले पाहिजे, असे आवाहन केले. ""पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील योजनेच्या यशस्वितेसाठी आग्रही असून, त्याचा गांभीर्याने विचार सर्वांनी केला पाहिजे. या योजनेमुळे शेतमालाची विक्रीव्यवस्था आणि शेतकऱ्याला मिळणारा भाव यात पारदर्शकता येणार आहे. सहनिबंधकांनी ई नामच्या अंमलबजावणीसाठी लक्ष घातले पाहिजे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नोंदणी लवकर पूर्ण करावी, पायाभूत सुविधा लवकर उभाराव्यात,'' अशा सूचनाही देशमुख यांनी केल्या. योजनेच्या अंमलबजावणीत कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com