सरकारमधून बाहेर पडण्याच्या भीतीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांची धाकधूक वाढली

सरकारमधून बाहेर पडण्याच्या भीतीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांची धाकधूक वाढली
सरकारमधून बाहेर पडण्याच्या भीतीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांची धाकधूक वाढली

मुंबई - मुंबई पालिका निकालांचे धक्के आता राज्याच्या राजकारणाला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असुन त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्‍येतेला बळ मिळत आहे. शिवसैनिकांचा प्रचंड दबाव आणि पक्षप्रमुखांच्या इच्छेमुळे शिवसेना मुंबई पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कॉंग्रेसची मदत घेण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्य सरकारवरही या घडामोडीचा प्रतिकुल परिणाम होण्याची शक्‍यता असुन सरकारमधुन बाहेर पडल्यास महतप्रयासाने मिळालेली मंत्रीपदे जाण्याच्या भीतीने सेना मंत्र्यांची धाकधूक वाढली असल्याचे समजते.

मुंबई पालिका निकालाचे फासे असे काही पडलेत की, शिवसेना व भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची यश मिळवूनही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. जनतेने या दोन्ही पक्षांना भरभरून मते दिली, पण स्पष्ट बहुमताचा कौल दिला नसल्याने संभाव्य राजकीय गणितांबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच शिवसैनिकांचा आता भाजपबरोबर राजकीय संसार थाटण्यास सक्त विरोध आहे. त्यामुळे सेना कॉंग्रेसबरोबर जाणार का? असा सवाल केला जात आहे आणि कॉंग्रेसबरोबर गेल्यास राज्य सरकारमध्ये सेना नेमकी कोणती भुमिका वठवणार, याबाबतही विचारणा होऊ लागली आहे. त्याचबरोबर मुंबईतील सत्ता मिळवण्यासाठी कॉंग्रेसची मदत घेऊन सरकारमधुन बाहेर पडायचे असाही एक मतप्रवाह सेनेत सुरू आहे. मात्र या शक्‍यतेमुळे सेनेच्या विद्यमान मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. दोन वर्षांच्या काळानंतर आताकुठे मंत्रीपदाचा उपभोग घेण्याची सवय अंगवळणी पडलेल्या सेनेच्या मंत्र्यांमध्ये या निकालामुळे अस्वस्थता पसरली आहे. त्यातच आज झालेल्या कॉंग्रेसच्या चिंतन बैठकीतील एकुणच रागरंगामुळे सेनेतील राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. सेना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमधून बाहेर पडल्यास आम्ही पाठिंब्याचा विचार करू, असे संकेत कॉंग्रेसने दिल्याने आता सेनेच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

भुसेंच्या राजीनाम्यामुळे मंत्र्यांमध्ये चलबिचल
मालेगाव तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पक्षाच्या अपयशामुळे आज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. या राजीनाम्यामुळे इतर मंत्र्यांची मात्र कुचंबणा झाली आहे. पक्षाची प्रगती हा मुद्दा घेतल्यास गोरेगावमधील ढळढळीत अपयशामुळे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, मराठवाड्यातील हिंगोली सारख्या जिल्हा परिषदा गमावल्याने दिवाकर रावते, विदर्भाची जबाबदारी असणारे डॉ. दिपक सावंत यांची भुसेंच्या नैतिक जबाबदारीच्या जाणीवेमुळे मोठी कुचंबणा झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com