मुंबई - देशातील पहिले दोन नदीजोड प्रकल्प राज्यात येत्या तीन महिन्यांत सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.
यात गोदावरी नदीच्या खोऱ्यातील दमगंगा-पिंजाळ, तर गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा तापीच्या खोऱ्यातील पार-तापी-नर्मदा या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.
दमणगंगा-पिंजाळसाठी दहा हजार कोटी तर पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडून 90 टक्के निधी दिला जाणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. ""राज्यात होणारे दोन्ही नदीजोड प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेच्या अंतर्गत केले जाणार आहेत. दमगंगा-पिंजाळ प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार आहेत. या प्रकल्पामुळे गोदावरीच्या खोऱ्यातील नाशिक, नगर आदी भागातील धरणे भरतील. याचा फायदा मराठवाड्यालाही होईल. तर तापीच्या खोऱ्यातील प्रकल्पाला 20 हजार कोटी रुपयांचा खर्च असून त्यात महाराष्ट्र आणि गुजरातने प्रत्येकी एक-एक हजार कोटी आणि उर्वरित 18 हजार कोटी केंद्र सरकार देणार आहे. यासाठी लवकरच दोन्ही राज्यांत या प्रकल्पासाठी करारही होणार असल्याने आतापर्यंत असलेला पाणी वाटपाचा वाद मिटणार असून उलट राज्याला यातून 50 टीएमसी अधिकचे पाणी मिळणार आहे,'' असे गडकरी म्हणाले.
या प्रकल्पामुळे धुळे, नाशिक, मालेगाव आदी भागांना मोठा फायदा होणार असून राज्यातील सिंचन क्षमतेत वाढ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, यामुळे शेतकरी आत्महत्याही थांबतील. राज्यात आत्ता 22 टक्के सिंचन क्षमता असून ती 49 टक्के क्षमता वाढविता येऊ शकेल. त्यासाठी आम्ही नदीजोड प्रकल्पासोबत इतर बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना देणे, अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणार असल्याने 2018 पर्यंत राज्याची सिंचन क्षमता 40 टक्क्यांपर्यंत पोचविणार असून त्यासाठी आपण केंद्राकडून 55 ते 60 हजार कोटी रुपये राज्याला मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
|