राज्यभरात फक्त 1082 शेतकऱ्यांना मिळाली मदत
मुंबई - शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सातत्याने अतिरंजित आकडेवारी देऊन आणि असत्य सांगून सरकार राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याने सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, सरकारने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा थाटात केली. मात्र, सरकारच्या या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. 12 जूनपासून शेतकऱ्यांना रकमेचे वाटप सुरू होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले, मात्र सरकारच्या घोषणेनंतर आतापर्यंत तीन आठवड्यांत राज्यभरातील फक्त 1082 शेतकऱ्यांनाच 10 हजाराची उचल मिळाली आहे. राज्यातील अहमदनगर, नागपूर, अकोला व वाशीम या चार जिल्ह्यांत एकूण 1 कोटी 8 लाख रुपयांचेच वितरण झाले. इतर जिल्ह्यांत एका नव्या रुपयाचेही वितरण झाले नाही. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडे कुठलाही पाठपुरावा करताना दिसत नाही. यावरून सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये किती अंतर आहे हे स्पष्ट झाले आहे.
कर्जमाफीसंदर्भात सरकारने दिलेले आकडेसुद्धा असेच फसवे आहेत, असे सावंत म्हणाले.
|