मुंबई - वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणीने राजकारण धुमसत असतानाच आता वेगळ्या कोकण राज्याची निर्मिती करण्यासाठी चळवळ उभारण्याची रणनीती सुरू झाली आहे. यासाठी स्वतंत्र कोकण समितीने नव्याने उभारी घेण्यासाठी शनिवारी (ता. 24) बैठक बोलावली असून, संयुक्त महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापण्याचे संकेत आहेत. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे स्वतंत्र कोकण राज्यात रूपांतर व्हावे, यासाठी नव्याने चळवळ सुरू करण्याचा मानस समितीने व्यक्त केला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियासोबत कोकणाची तुलना होत असताना, विकासाच्या बाबतीत मात्र कोकण कायमच उपेक्षित राहिल्याने वेगळे राज्य झाल्याशिवाय कोकणाचा विकास शक्यच नसल्याचे मत समितीने पत्रकात म्हटले आहे. वेगळ्या कोकण राज्याच्या निर्मितीसाठी चर्चा व पुढील दिशा ठरवण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात शनिवारी (ता. 24) सायंकाळी 5 ते 9 दरम्यान ही बैठक होणार असून, कोकणी नागरिकांना रणनीती ठरवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण कृती समितीचे निमंत्रक दिलीप लाड यांनी केले आहे.
|