मुंबई - पहिल्या पत्नीच्या संमतीने दुसरा विवाह केला असला, तरी तिच्या मृत्यूनंतर तिच्या सरकारी निवृत्तिवेतनावर पतीचा अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
'पहिल्या पत्नीला मूल होत नसल्याने तिच्या परवानगीने दुसरा विवाह केला होता. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर आपल्याला तिचे निवृत्तिवेतन मिळावे, 'अशी मागणी करणारी याचिका गजानन सोटे (नाव बदलले आहे) यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती.
पहिली पत्नी वंदना यांच्याशी सोटे यांचा सुमारे 45 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, मूल होत नसल्याने वंदनाच्या संमतीनेच सोटे यांनी 1988 मध्ये दुसरा विवाह केला. अशाप्रकारचा विवाह त्या काळात अधिकृत समजला जायचा, असा दावाही सोटे यांनी केला होता. वंदना या पुण्यातील महिला बालविकास विभागात बालसेविका नोकरी करीत होत्या. त्यांना निवृत्ती वेतनही लागू झाले होते.
वंदना यांच्या मृत्यूनंतर विधुर या नात्याने त्यांची पेन्शन मला मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज सोटे यांनी महिला बालकल्याण विभागाकडे केला होता. मात्र, अर्ज नामंजूर करण्यात आला. दुसरे लग्न केल्यामुळे याचिकादार "विधुर' या गटात येत नाही. असा निर्णय राज्य सरकारने दिला. याविरोधात सोटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्या. सुनील देशमुख आणि न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
दुसरे लग्न केले; मग विधुर कसा?
कायद्यानुसार "विधुर' म्हणजे पत्नीचा मृत्यू झाला आहे ती व्यक्ती. मात्र, दुसरा विवाह केला असेल तर ती व्यक्ती विधुर होऊ शकत नाही. तसेच, पहिल्या पत्नीच्या संमतीने दुसरा विवाह केला असला, तरीही तो विधुर गटात येत नाही, असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा दावा मान्य केला. दुसरे लग्न केले असताना पहिल्या पत्नीची पेन्शन मिळवण्यासाठी विधुर म्हणून याचिका करणे अयोग्य आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि याचिका फेटाळली.
|