मुंबई - कोयना प्रकल्पबाधित गावांना नागरी सुविधा देण्यासंदर्भातील 3 कोटी 29 लाख रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता पंधरा दिवसांमध्ये देण्यात येणार असून, संबंधित दुरुस्ती कामांना नव्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. यासंदर्भात शिवसेनेचे सदस्य शंभुराज देसाई यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
या वेळी कांबळे म्हणाले, कोयना प्रकल्पांतर्गत 35 कोटी 10 लाख 76 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच चालू वित्तीय वर्षामध्ये विभागाकडून 1 कोटी 30 लक्ष 83 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. धरणाची उंची वाढवून 25 अब्ज घनफूट पाणीसाठा वाढविण्यात येणार आहे. यामुळे संबंधित परिसरातील जमिनीवर गावकऱ्यांचे पुनर्वसन होऊ शकत नाही. मात्र, गावठाणांतील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासंदर्भात शासन विशेष बाब म्हणून प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले.
बाळगंगा प्रकल्पातील बाधित तीन हजार कुटुंबामध्ये गावठाणमधील 25 कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांमध्ये सामावून घेण्यासाठी शासन सकारात्मक विचार करील. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य सर्वश्री बाळासाहेब पाटील, धैर्यशील पाटील यांनी सहभाग घेतला.
|