मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वादग्रस्त आरोपी आमदार रमेश कदम यांचे 22 महिन्यानंतर मंगळवारी मंत्रालयात आगमन झाले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी कदम हे तुरूगांत आहेत. मात्र, गृह विभागाच्या सचिवांच्यासमोर सुनावणीसाठी त्यांना आज मंत्रालयात आणण्यात आले होते.
या महामंडळाच्या कर्जवाटपात मी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही. जे पैसे दिले ते सर्व कर्जरूपाने होते. त्या कर्जाच्या रकमेची रितसर वसुली देखील सुरू असल्याची बाजू त्यांनी गृहसिचवांच्या समोर मांडली. या आर्थिक गैरव्यवहारात केलेली अटक देखील लोकसेवकाला असलेल्या नियमांचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप कदम यांनी केला.
"सीबीआय"ची संपूर्ण कारवाई देखील संशयास्पद असल्याचा दावा करीत, 'मी ज्या पक्षाचा आमदार आहे त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकाही नेत्याने मागील 22 महिन्यात माझी विचारपूस देखील केली नाही. याची खंत वाटते'', अशा शब्दात त्यांनी माध्यमांच्या समोर नाराजी व्यक्त केली. राज्यातल्या एका विधानसभा मतदारसंघातून मी मतदानाने निवडून आलेला आमदार आहे. त्यामुळे, "सीआयडी'ने अटक करताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यायला हवी होती, असा दावाही त्यांनी गृहसचिवांच्या समोर केला.
पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा
आर्थर रोड कारागृहातील पोलिसांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी बोलताना कदम म्हणाले की, संबधित पोलिस अधिकाऱ्याने माझ्याकडे पैशाची मागणी केली होती. याबाबत मी रितसर कायदेशीर कारवाई देखील करणार असून या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|