शिवसेनेच्या विरोधामुळे नव्या पर्यायावर भाजपकडून विचार
मुंबई - कॉंग्रेसचा त्याग करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत पाठवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महाराष्ट्रात राणे यांना मंत्रिपदाची शपथ दिल्यास शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची चिन्हे असल्याने राणे यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणारा मार्ग शोधला जात आहे.
एसटी महामंडळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारासंबंधीच्या चर्चेतला गतिरोध कायम राहिल्याने या पर्यायाचा विचार केला जात आहे. महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या जागांची वाट पाहण्याऐवजी भाजपची सत्ता असलेल्या एखाद्या राज्यातून नारायण राणे यांना राज्यसभेत पाठवता येईल का? याचीही चाचपणी केली जात असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
मंत्रिमंडळ समावेशाबाबत राणे यांनी जाहीरपणे केलेली विधाने, अंत पाहू नका या भावनेची केलेली जाहीर वाच्यता भाजप नेतृत्वाला आवडली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, राणेंसारख्या दिग्गज नेत्याला नाराज ठेवले अन् सत्तेत सहभागी करून घेता आले नाही तर; भाजपकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघ थांबेल. निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक असताना भाजपप्रणित आघाडीत स्वतःहून सामील झालेल्या राणे यांना सामावून घ्यायलाच हवे, असे राज्यातील बहुतांश भाजप नेत्यांचे मत आहे.
गुजरातमधील निकालांचा कल लक्षात घेता कॉंग्रेसकडे वळणाऱ्या मतांची संख्या वाढू शकते, अशी भाजपमधील काही नेत्यांना भीती आहे.
शिवसेना आणि भाजप लोकसभा आणि विधानसभेत वेगवेगळे लढल्यास नारायण राणे यांचा उपयोग होऊ शकेल, असेही भाजप नेत्यांना वाटते. मात्र, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीत एकत्र आल्यास शिवसेनेला समवेत ठेवणे गरजेचे ठरू शकते.
दावोसदौऱ्यानंतर निर्णय
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राणे यांच्यावरील नाराजी अद्याप कायम आहे. राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यास ते भाजपलाही अडचणीचे ठरू शकते. राणे यांच्या आघाडीला एक मंत्रिपद दिल्यास अन्य घटक पक्षांची मागणी वाढेल. त्यामुळेच राणे यांना शांत करायचे कसे? असा प्रश्न भाजपसमोर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राणे यांनी केलेला अभ्यास तसेच सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांची विशेषत: शिवसेनेतील बहुतांश मंडळींची त्यांना असलेली माहिती ही जमेची बाजू भाजपला मोहात पाडणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून परत आल्यावर राणे आणि विस्तार या विषयावर चर्चा होईल, असे समजते.
|