मुंबई - नारायण राणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यास विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा मार्ग चोखाळण्याचे शिवसेनेने स्पष्ट केल्यामुळे अखेर भाजपने नमते घेतले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार नसतील हे आता स्पष्ट झाले असून, माघारीचा निर्णय घेत भाजपने संख्याप्रदर्शन करणे सोपे नसल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. राणे यांनीही आपल्या विजयाची खात्री नाही या धास्तीने "झाकली मूठ सव्वा लाखा'ची मानली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना राणे यांना उमेदवारी दिली, तर शिवसेना तटस्थ राहाणेही शक्य होणार नसल्याची कल्पना दिल्याचे समजते. राणे यांच्यासाठी भाजपने प्रतिष्ठा लावण्याचे कारण नाही, अशा निष्कर्षापर्यंत भाजप नेते आले आहेत. राणे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविल्यास भाजप त्यांना मदत करण्यास उत्सुक होता; पण त्यांनी तशी तयारी दाखविण्यास नकार दिला आहे, असे सांगण्यात येत होते. हिवाळी अधिवेशनात एकत्रित मोर्चांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने हातमिळवणी केली आहे.
अशा परिस्थितीत विरोधी ताकद एकत्र येत असल्याने शिवसेनेला दुखावणे योग्य ठरणारे नाही, अशी फडणवीस यांची भूमिका असल्याचे समजते. राणे यांच्या पक्षाला विधान परिषदेत शिरण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याने आता शिवसेना कोणत्याही नावाला पाठिंबा देण्यास तयार होईल. भाजप पुढील काळात शिवसेना उमेदवाराला परिषदेत पाठिंबा देईल.
प्रसाद लाड की माधव भांडारी?
शिवसेनेने ऐनवेळी वेगळा सूर लावल्यास सर्वपक्षीय संबंध असलेल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना रिंगणात उतरविण्याचा भाजपचा विचार होता. मात्र शिवसेना समवेत असल्यास भाजपतील निष्ठावंत कार्यकर्त्याला परिषदेत पाठवावे असा मतप्रवाह आहे. विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ अपुरे असल्याने विरोधकांचे हल्ले परतविण्यासाठी प्रवक्ते माधव भांडारी योग्य उमेदवार ठरतील असा मतप्रवाह आहे. पक्षाचे माजी संघटक रघुनाथ कुळकर्णी आणि गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक वर्तुळात भाजपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शायना एन. सी. यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा पाठिंबा हे या उमेदवारीसाठी महत्त्वाचे शक्तिस्थान असेल.
|