मुंबई - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे; पण या प्रकरणातील दुसरे सूत्रधार संभाजी भिडे अजूनही बाहेर आहेत. हे पचनी पडत नाही. त्यांना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तीला चौकशीला बोलावणे बंधनकारक असते; मात्र भिडे यांना चौकशीला बोलावले गेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भिडे यांना अटक झाल्यास वातावरणातील तणाव निवळेल. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणारा माझा मोर्चा अडवल्यास राज्यभर 144 कलम लागू करावे लागेल, असेही ते म्हणाले.
"ऍट्रॉसिटी'बाबतचा निर्णय दुर्दैवी
ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी असून, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. या निर्णयामुळे संबंधितांना अभय देण्याचे काम न्यायालयाने केले आहे. असे निर्णय झाल्यास लोकांचा न्यायालयावरील विश्वास कमी होईल. हा मुद्दा "लार्जर बेंच'पुढे न्यायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
|