मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबतची जवळीक जरा लांबूनच ठेवा. राजशिष्टाचार वगळता भाजप नेत्यांशी फारशी जवळीक करू नका. कॉंग्रेस हाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मित्र आहे. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस नेत्यांसोबत जवळीक वाढवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत नेत्यांना सल्ला दिला.
सध्या जनमानस भाजपच्या विरोधात जात आहेत. सरकारची धोरणे व अंमलबजावणी यांचा सुतराम संबंध राहिलेला नाही. त्यामुळे भाजप नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारसे कार्यक्रम एकत्र करू नयेत. ज्या ठिकाणी सरकारी राजशिष्टाचार आहे, अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास हरकत नाही, असे पवार यांनी नेत्यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्यासोबत दोन तास बैठक घेतली. शेतकरी कर्जमाफीसह सरकारच्या फसलेल्या इतर निर्णयांबाबत राष्ट्रवादीने आक्रमक व्हायला हवे, असा आदेश त्यांनी या वेळी दिला. राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय शिबिर कर्जत (रायगड) येथे 6 व 7 नोव्हेंबरला होत आहे. याबाबतची तयारी व शिबिरात चर्चिल्या जाणाऱ्या विषयांसंदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला.
|