मुंबई - नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडून येणारा उमेदवार रिंगणात दाखल करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसलाही या महाआघाडीत सामील करून घेत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याचे मनसुबे प्रत्यक्षात येतील काय याची चाचपणी सध्या सुरू असल्याचे समजते. नारायण राणे यांनी तयारी दाखवल्यास त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राणे यांनी भाजपशी जवळीक वाढवली तरी शिवसेनेशी असलेल्या संबंधांवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, असे आश्वासन देणे म्हणजे अंतर्गत बाबीत लक्ष घालू नका, असे सभ्य शब्दात सांगणे होय, असे एका शिवसेनेच्या नेत्याने म्हटले आहे. त्यामुळे पर्यायी रचना आखायला प्रारंभ केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच पर्यायांच्या चाचपणीअंतर्गत शिवसेनेने मतांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीशी अनौपचारिक संपर्क साधला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळचे संबंध असणाऱ्या शिवसेनेच्या एका खासदार नेत्यामार्फत हा संपर्क साधण्यात आला आहे. शिवसेना या प्रस्तावाबाबत कितपत गंभीर आहे, केवळ राणे विरोधासाठी शिवसेना रिंगणात उतरण्याचा विचार करीत आहे काय, याचा आढावा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजपविरोधात आघाडी उभारायची असल्यास कॉंग्रेसनेही पुढे येण्याची तयारी दाखवली आहे. सत्तारूढ आघाडीत पदाच्या आशेने सामील झालेल्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्याच्या धाडसाचे रूपांतर पराभवात करण्यास कॉंग्रेस उत्सुक आहे.
नारायण राणेंची माघार?
दरम्यान, नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक नसल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र, राणे यांनी नकार दिल्यास लाड यांना नामांकन पत्र दाखल करण्यास तयार राहा, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपत बाहेरून आलेल्या मंडळींना अवास्तव महत्त्व दिल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यास माधव भंडारी यांना निवडणूक लढण्याचे आदेश दिले जाणार असल्याचेही बोलले जाते. मात्र, या निवडणुकीतील रंगत लक्षात घेता याबद्दलचा अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी होण्याची शक्यता गृहित धरण्यात येत आहे.
|