मुंबई - आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, फक्त उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट बघत आहोत, असे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सांगितले; पण त्यांचे राजीनामे आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून थापा मारण्याचे काम केले जात असून, शिवसेना सत्तेत असणे म्हणजे थट्टेचा विषय झाला आहे, असे कॉंग्रेस आमदार नीतेश राणे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
शिवसेना पक्षाचे सरकारमध्ये कोणतेही स्थान नसून राजकीय क्षेत्रात स्वतःचे हसे करून घेत आहे. सत्तेत असलेल्या आपल्याच मित्रपक्षासोबत उंदीर मांजराचे खेळ करत आहेत, असेही राणे म्हणाले.
राज्य सरकारमध्ये भाजपसोबत हातात हात घालून असलेली शिवसेना नेहमीच सरकारमधून बाहेर पडण्याच्या थापा मारत असते; पण अजूनही सेनेचे नेते याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. भाजपसोबत सत्तेमध्ये राहून राज्यातील सामान्य जनतेची दिशाभूल करत असून, या थापांची दखल "गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये करावी, अशा मागणीचे पत्र कॉंग्रेस आमदार नीतेश राणे यांनी लिहिले असून, शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
|