मुंबई - मोठ्या दिमाखात सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. फटाके फोडले. मिठाई वाटली; पण या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी करणार ?
असा सवाल करत सरकारच्या घोषणेनंतर लाभ मिळाला नाही म्हणून एका कोवळ्या वयाच्या मुलीने पित्याचे हाल बघून आत्महत्या केली. सरकारला कधी जाग येणार की नाही ? असा संताप आज विधानसभेत व्यक्त केला.
जवळाझुटा (जि. परभणी) इथे कर्जबाजारी व नापिकीमुळे वडिलांच्या आत्महत्येच्या भीतीने एका मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा दाखला देत अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, 'बारावीत शिकत असलेल्या सारिका झुटे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून, काही दिवसांपूर्वीच कर्जबाजारीपण व नापिकीने तिच्या काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. पाऊस नसल्यामुळे पीक वाळून जात असल्याने कर्जबाजारीपणामुळे काकांनी आत्महत्या केली. वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती. त्यामुळे त्याआधीच तिने आपले जीवन संपवले.'' आत्महत्या करण्यापूर्वी सारिकाने लिहिलेले भावनिक पत्रदेखील अजित पवार यांनी वाचून दाखवले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'या आत्महत्याची जबाबदारी कोण घेणार ? सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, यावरून लोकांचा सरकारवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र, त्यांनाही मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढावे लागत आहेत. राज्यातील किती शेतकऱ्यांनी विमा भरला?, किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरला याची माहिती द्यावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
|