मुंबई - शेतकऱ्यांच्या आडून असंतोष वाढवण्याचे काम सध्या देशभरात होत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. ते मुंबईच्या भेटीवर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे झाली. याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, की मध्य प्रदेश राज्यात शेतकऱ्यांवरील गोळीबार समर्थनीय नाही. शेतकरी आंदोलनात सुरक्षा दलांचा कमीत कमी वापर व्हायला हवा. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजप सरकार संवेदनशील आहे. सध्या अडचणीचा काळ आहे, शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करावे. ते समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांचे लवकरच समाधान होणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या सध्या झालेल्या दुरवस्थेला कॉंग्रेस पक्ष जबाबदार आहे, अशीही पुष्टी सिंह यांनी जोडली. शिवसेना सत्तेत सहभागी असून, सतत विरोधी पक्षासारखी वागत आहे, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, की शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असू शकतात; पण ते आमचे सहकारी आहेत आणि यापुढेही राहतील. मोदी यांच्या कारकिर्दीत देशाची शान जगामध्ये वाढली असल्याचेही सिंह यांनी या वेळी सांगितले.
|