मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या आघाडी सरकारने लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असून, काही बाबतीत आश्वासनांच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. मोदी सरकारला उद्या तीन वर्षे पूर्ण होत असून पक्षातर्फे देशभर जनतेला सरकारच्या कामगिरीचा हिशेब सादर करण्यात येत आहे, असे भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, महागाई कमी करणे, रोजगारनिर्मिती, भ्रष्टाचाराला आळा घालणे, राज्यांना अधिक अधिकार, गरिबांचे सबलीकरण, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींचे कल्याण, शेतीचा विकास, महिलांचे सशक्तीकरण, दिव्यांगांचे अधिकार, लहान मुलांचे आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढविणे अशा अनेक बाबतीत भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. |
|