मुंबई - केद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षातील प्रमुख नेते, साहित्यिक, लेखक, विचारवंत यांनी 26 जानेवारी ला "संविधान बचाव रॅली'चे आयोजन केले असून, यामध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेलदेखील सहभागी होणार आहेत. आज हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर कट्टर धार्मिकता वाढीस लागल्याने विविध धर्मामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप आहे. दलित व आदिवांसी यांच्यावरील हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. लोकशाहीवादी विचारांना बगल देत मनमानी कारभार सुरू असताना धार्मिक समाजकंटकावर कोणताही अंकुश नसल्याचा निषेध म्हणून ही रॅली काढण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, विविध पक्षाचे व डाव्या विचारांचे देशभरातील दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. महाविद्यालयीन युवकांचाही यामध्ये सहभाग राहणार आहे. मंत्रालय ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान ही रॅली निघणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या आयोजनात आव्हाड यांचा सहभाग असल्याबाबत विचारले असता त्यांनी तो नाकारला. खासदार राजू शेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, मलाही सहभागी होण्याची विनंती केल्याने या रॅलीत सहभागी होणार असल्याचे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर हेदेखील या रॅलीमधे सहभागी होणार असल्याची माहिती होती. मात्र, आज त्यांनी ही रॅली मुंबईऐवजी दिल्लीत काढायला हवी अशी भूमिका मांडल्याने त्यांच्या सहभागाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
|