मुंबई - ग्रामीण भागात विशेषविशेषज्ञांअभावी प्रसूतीदरम्यान होणारे माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात सुरवात झाली आहे. राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यांतील 101 आरोग्य संस्थांमध्ये 128 खासगी विशेषज्ञ डॉक्टरांची कंत्राटी, अर्धवेळ व "ऑन कॉल' या पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञांचा समावेश आहे.
दोन महिन्यांत सुमारे बाराशेहून अधिक प्रसूती शस्त्रक्रिया या खासगी विशेषज्ञांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. माता व बालमृत्यू दर रोखण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजनांबरोबरच हा एक महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात नियुक्ती देऊनदेखील डॉक्टर कामावर हजर न होण्याचे प्रमाण जास्त आहे. सरकारच्या आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात विशेषज्ञांची उपलब्धता नसल्याने सामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देताना अडचणी येतात. बऱ्याचदा काही आरोग्य केंद्रांमध्ये एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर रुग्ण तपासणी आणि त्या अनुषंगाने ताण येतो, तर काही ठिकाणी विशेषज्ञच उपलब्ध होत नाही, या सर्व बाबींचा विचार करून खासगी विशेषज्ञांची सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वीही खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जायची, आता मात्र त्यांना मानधनाबरोबरच कामानुसार अतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतल्याने खासगी डॉक्टर आपली सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये देण्यास उत्सुक असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
नव्याने नियुक्त विशेषज्ञ
स्त्रीरोग तज्ज्ञ 116 असून, त्यात कायमस्वरूपी 64 आणि कंत्राटीपद्धतीवरील 52 विशेषज्ञांचा समावेश आहे. भूलतज्ज्ञांची संख्या 75 असून, त्यात कायमस्वरू 30 आणि कंत्राटीपद्धतीवरील 45 डॉक्टरांचा समावेश असून, बालरोग तज्ज्ञांमध्ये कायमस्वरूपी 61 आणि कंत्राटीपद्धतीवरील 30 असे एकूण 91 विशेषज्ञांची संख्या आहे. एकूण 282 विशेषज्ञांमध्ये 128 खासगी विशेषज्ञ आहेत.
|