मुंबई - तरुणांनी उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बनावे, असे आवाहन राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी आज केले. उत्तन (जि. ठाणे) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित आर्थिक जनतंत्र परिषदेच्या (इकोनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह) उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांची उपस्थिती होती. या परिषदेत ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेंचर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले 200 यशस्वी उद्योजकसुद्धा होते.
उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, की संस्था, उद्योग परिवार, खासगी बॅंका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये, तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेन; पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेन, स्वत:चा व्यवसाय सुरू करेन, अशी भावना त्यामागे हवी.
युवा शक्ती मोठी ताकद - फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की अशा परिषदेमुळे आणि त्यातील अनुभव कथनामुळे प्रगतीचा नवा मार्ग आपल्याला मिळेल. सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे. मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. आजची युवा शक्ती ही देशाची मोठी ताकद आहे, त्यांच्यात कल्पकता व नवनिर्माणाचा दृष्टीकोन आहे. गरज आहे ती त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची. यासाठी स्टार्ट अप, मुद्रा, कौशल्य विकास यासारख्या योजना महत्वपूर्ण आहेत. भारत हा केवळ युवकांचा नाही तर युवा उद्योजकांचा देश म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
|