नेवाळीप्रकरणी सरकार अपयशी

नेवाळीप्रकरणी सरकार अपयशी

कल्याण - नेवाळी परिसरातील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार आणि गोळीबार केला, ही दुर्दैवी घटना आहे. हे आंदोलन हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले, असा आरोप करून या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या सेवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी केली. 

नेवाळी परिसर नौदलाकडून मोठी संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे आंदोलक गुरुवारी (ता.२२) रस्त्यावर उतरले होते. या वेळी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अमानुषपणे लाठीमार आणि गोळीबार केला. या जखमी शेतकऱ्यांवर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

‘नेवाळी प्रकरणामध्ये राज्य सरकारने हलगर्जीपणा केला. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नाही. आता अधिकारीही गायब आहेत,’ असा आरोप विखे पाटील यांनी केला. राज्य सरकार बंदुकीचे धाक दाखवित शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पावसाळी अधिवेशनामध्ये या घटनेचा जाब विचारणार आहोत. राज्य सरकार असंवेदनशील असल्याचे या घटनेमुळे पुन्हा समोर आले आहे, असे ते म्हणाले.  

स्थानिक खासदार आणि आमदारही या प्रकरणात अपयशी ठरल्याचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून माहिती घेतली. 

पत्रकारांकडून निषेध 
नेवाळी परिसरातील आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण झाली होती. त्याचा आज पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com