मुंबई - महाराष्ट्रातील सर्व गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शासन संपूर्णत: प्रयत्नशील आहे, असे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज सांगितले.
"मातोश्री'तील बैठकीनंतर महसूलमंत्री पाटील यांनीच पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ""सरकार करत असलेल्या या सर्व प्रयत्नांची आकडेवारीनिशी माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे.
शिवसेनेकडून कर्जमाफीसंबंधी संपूर्ण सहकार्य अपेक्षित आहे असे स्पष्ट केले,'' असे पाटील यांनी सांगितले.
आज सायंकाळी महसूलमंत्री पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अडचणीतले शेतकरी; तसेच कर्जमाफीचे निकष यावर सुमारे दीड तास झालेल्या चर्चेत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना उच्चाधिकार समितीत आपली भूमिका मांडेल, असे दिवाकर रावते यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
|