राज्य खड्डेमुक्त झाल्याचा मंत्र्यांचा दावा

राज्य खड्डेमुक्त झाल्याचा मंत्र्यांचा दावा

नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविणात येणार असल्याचे सांगितले होते. यासाठी मंत्रालयात ‘वॉर रूम’ही सुरू केली होती. या मोहिमेला यश आले आहे. प्रमुख राज्य मार्ग व राज्य मार्गांवरील ९७.२५ टक्के, तर प्रमुख जिल्हा मार्गांवरील ८२.८४ टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. काही मार्गांवर जर खड्डे आढळले तर नागरिकांनी कळवावे, ते खड्डे तातडीने बुजविण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी खड्डेमुक्त रस्ते अभियानाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून राज्यातील रस्त्यांची कामे ही वाहतुकीचा अंदाज न घेता, क्षमता न पाहता करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात राज्य मार्गांवरील रस्त्यांवर खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकूण ८९ हजार १९० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामध्ये सहा हजार १६३ किलामीटरचे प्रमुख राज्य मार्ग, ३० हजार ९७० कि.मी.चे राज्य मार्ग आणि ५२ हजार ५७ कि.मी. लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. आज दुपारपर्यंत यातील प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्डे पडलेल्या २३ हजार ३८१ कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी २२ हजार ७३६ कि.मी. (९७.२५ टक्के) लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. १७ जिल्ह्यांतील खड्डे शंभर टक्के बुजविण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी टिकाऊ डांबरीकरण आणि रोड कोटिंग करण्यात आले. काही ठिकाणची तुरळक ठिकाणी तांत्रिक अडचणी, अवकाळी पाऊस अशा कारणांस्तव कामे पूर्ण झाली नसली तरीही पुढील उर्वरित जिल्ह्यांतील कामे लवकरच पूर्ण करण्यात येत आहेत.

प्रमुख जिल्हा मार्गाचे रस्ते हे जिल्हा परिषदांकडून बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले आहेत. यातील ५२ हजार ५४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी ३२ हजार ५८८ कि.मी. लांबीच्या रस्त्यांवर खड्डे पडले होते. 

यातील २६ हजार ९९४ कि.मी. लांबीच्या (८२.८४ टक्के) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदांकडून वर्ग झालेले रस्ते हे रोहयोअंतर्गत तयार केलेले असल्यामुळे, तसेच त्यांची अवस्था खूपच खराब असल्यामुळे या रस्त्यांची कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.  

उत्कर्ष महामार्ग उपक्रम
राज्यातील जनतेला कायमस्वरूपी दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लवकरच मोठ्या प्रमाणावर रस्ते नूतनीकरण व सुदृढीकरणाचा कार्यक्रम सुरू करणार आहे. तसेच नव्या वर्षात राज्यात ‘उत्कर्ष महामार्ग’ उपक्रम सुरू होत आहे. ज्यामध्ये ‘हायब्रीड न्यूईटी मॉडेल’च्या सुधारित तत्त्वावर राज्यभरात सुमारे दहा हजार किलोमीटरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com