मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (Congress) महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यावरून नाना पटोलेंनी टीका केली असून आपल्या कार्यकर्त्यांना आवरा, असा इशारा फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण निंदनीय आहे. प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयी देखील आदर निर्माण करणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावी, असा इशारा पटोलेंनी फडणवीसांना दिला आहे. तसेच या घटनेची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील पटोलेंनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय? -
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात इराणी बोलायला उठल्या तेव्हा, जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील राष्ट्रवादी किंवा भाजप दोनपैकी कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते दोषी असतील तर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.