मुंबई - कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात सुरू असलेले शिवसेनेचे आंदोलन म्हणजे शिवसेना-भाजपतील "मॅच फिक्सिंग' असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा आहे.
परंतु, हा प्रकल्प आपल्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे पाप मस्तकी यायला नको म्हणून भाजपने शिवसेनेला हाताशी धरले आहे. दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनितीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपने सुरवातीला या प्रकल्पाची रदबदली करून काही काळाने जनमताचा आदर करीत असल्याची सबब सांगायची आणि हा प्रकल्प रद्द करायचा, असे हे कारस्थान असल्याचा आरोप विखे यांनी केला.
कर्जमाफीनंतर मागील तीन महिन्यांत झालेल्या शेतकरी आत्महत्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केल्याच्या घटनेबाबत बोलताना विखे म्हणाले, की कर्जमाफीच्या निर्णयाबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक नव्हती. त्यामुळेच या योजनेच्या अंमलबजावणीत मोठी हेळसांड करण्यात आली. कर्जमाफीनंतरही मागील तीन महिन्यांत शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. थकीत कर्जामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीची आवश्यकता होती; परंतु कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत, यावरून या कर्जमाफीतून शेतकऱ्यांना भरीव दिलासा मिळू शकतो, हा विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. थकीत कर्जामुळे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केली, हे सरकारसाठी अत्यंत लांच्छनास्पद आहे, असे विखे म्हणाले.
नाणार प्रकरणी भाजप-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मुर्ख बनवू पाहत आहेत. एकीकडे शिवसेनेचे उद्योगमंत्री विधानसभेत हा प्रकल्प रद्द केल्याचे सांगतात, तर दुसरीकडे भाजपचे केंद्र सरकार या प्रकल्पाला विविध प्रकारच्या मान्यता देते, हा दुटप्पीपणा आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते
|