पुणे - मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सोलापूरसह दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. तेथील सरासरीच्या वीस टक्केही पाऊस पडल्याची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली.
राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल होऊन महिना झाल्यानंतरही उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सांगली, नंदूरबार, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पावसाने दडी मारली आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 10 जुलै या दरम्यान पडणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा 64 टक्क्यांहून जास्त पाऊस पडला आहे. नागपूर येथे सरासरीपेक्षा 95 टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
खूप जास्त पाऊस पडलेले जिल्हे - मुंबई, पालघर, ठाणे, नागपूर
सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेले जिल्हे - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, नगर, उस्मानाबाद, नांदेड, वाशीम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.
सरासरी पाऊस पडलेले जिल्हे - कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, बीड, परभणी, हिंगोली, गोंदिया.
पावसाने दडी मारलेले जिल्हे - सांगली, नंदरबार, जालना, बुलडाणा.
|