वणवे रोखण्यासाठी उपाययोजना आवश्‍यक

वणवे रोखण्यासाठी उपाययोजना आवश्‍यक

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने डोंगर परिसरातील लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. वणवे रोखण्यासाठी स्थानिक मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात जंगले आहेत. याच तालुक्‍याच्या हद्दीवर चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. अनेकवेळा या उद्यानातही आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. उद्यानाबाहेर असणाऱ्या डोंगरकपारीतही आगी लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे सह्याद्रीचा डोंगरकपारीतील वने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर उपाय करण्याची वेळ आली आहे. 

उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत असून, अंडी व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणाची आहुती देतात. याबाबत जनजागृती चळवळ उभारण्याची गरज आहे. हे वणवे पावसाळ्यात गवत चांगले यावे, म्हणून लावले जातात. काही जण सहज जाताजाता विडी, सिगारेट पेटवून टाकतात. त्यामुळे आगी लागतात. काही जण केवळ हौस म्हणून आग लावतात, तर काही जण शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. तीच आग आटोक्‍यात न आल्यास इतर ठिकाणी आगी लागतात. वनातील अथवा वनालगतच्या शेतातील झाडांवर असणारे मधमाश्‍यांचे पोळे काढण्यासाठीही आग लावली जाते.

हे करू नये
 वनात स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे.
 वनात बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नये. 
 वनातील अथवा वनालगतच्या शेतातील वनोपज गोळा करण्यासाठी त्या झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.
 रात्री वनातून जाताना हातात टेभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. त्या ऐवजी बॅटरी घेऊन जावे.
वनालगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये.
प्रतिबंधक उपाय
 शासकीय व खासगी जंगलात सहा व बारा मीटरच्या जाळरेषा काढणे.
 मोठमोठ्या जंगलात आग निरीक्षण मनोरा उभारणे.
 रस्त्याच्या दुतर्फा सहा मीटरची जाळरेषा काढणे, जाळरेषेवर पडलेला पालापाचोळा वारंवार झाडणे.
 आगीचा धूर दिसताच याबाबत जवळच्या वनाधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना याची 
माहिती देणे.

आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक आत जाऊन आगी लावत असल्याने जंगलांना आग लागते. जंगलाजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांना ५०० रुपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.
- तानाजीराव मुळीक, वनक्षेत्रपाल-शिराळा

आगीचा परिणाम असा होतो
 गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात. 
 वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते. 
 चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात.
 ती अशक्‍त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात. 
 वनात पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात. 
 वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते. 
 जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो. 
 जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.
 भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.
 कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.
 विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com