Damodar Mavjo: हिंदी राष्ट्रभाषेवरून देशाची दुसरी फाळणी नको

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांचे मत
No need for another partition of the country on the basis of Hindi national language Jnanpith Award Winner Damodar Mavjo
No need for another partition of the country on the basis of Hindi national language Jnanpith Award Winner Damodar Mavjosakal

लातूर : ‘‘मराठी, पंजाबी, बंगाली आदी भाषा या राष्ट्रभाषाच आहेत. केवळ हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून पुरस्कार करणे मान्य नाही. दक्षिण व उत्तर भारत अशी देशाची दुसरी फाळणी करायची नसेल तर या प्रकाराला विरोध करण्याची गरज आहे,’’ असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. उदगीर येथे २२ ते २४ एप्रिलदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला मावजो हे विशेष निमंत्रित आहेत. ते कोकणी साहित्य विश्‍वात कथाकार, कादंबरीकार तसेच समीक्षक, पटकथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘कार्मेलिन’ ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. मावजो हे मराठीद्वेष्टे असल्याचा आरोप करून त्यांना गोव्यातील काही मराठी साहित्यिकांकडून उदगीरच्या संमेलनाला जाण्यास विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर मावजो यांनी स्पष्ट मते मांडली.

उदगीरला येणारच

‘‘आतापर्यंत मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी झालेलो नाही. पण मी मुंबई, पुण्‍यासारख्या शहरांत गेलो आहे. तेथील साहित्यिकांना भेटलो आहे. आता पहिल्यांदाच उदगीरसारख्या ग्रामीण भागात जाण्याची संधी मिळत आहे. मराठीसोबतच हे बहुभाषिक संमेलन असेल. इतर भाषांचाही तेथे मान राखला जाणार आहे. ग्रामीण भागात प्रतिभावान तरुण साहित्यिक आहेत. नवीन उमेदीचे लेखक व वाचकांची भेट होणार आहे,’’ असे मावजो यांनी स्पष्ट केले.

दर्जेदार साहित्यनिर्मिती व्हावी

‘‘मराठी साहित्यातील विश्वास पाटील, रंगनाथ पठारे, लक्ष्मीकांत देशमुख, आसाराम लोमटे अशा अनेक लेखकांचे साहित्य वाचले आहे. चांगले साहित्य असेल तर ते आवर्जून वाचतो. साहित्य चांगले असेल तर त्याचा अनेक भाषांत अनुवादही होतात. माझ्या ‘कार्मेलिन’ कादंबरीचे १४ भाषांत अनुवाद झाले. मराठीत प्रा. नरेश कवडी यांनी अनुवाद केला. त्या अनुवादालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्यिकांनी पुरस्काराकडे न पाहता दर्जेदार साहित्याची निर्मिती करावी. ‘नोबेल’ पुरस्कारासाठी आपल्या साहित्यिकांचे साहित्य पोचले पाहिजे. यासाठी प्रकाशकांच्या पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत,’’ अशी अपेक्षा मावजो यांनी व्यक्त केली.

दादागिरीला विरोध

‘‘हिंदी भाषकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हिंदी राष्ट्रभाषा करण्याचा खटाटोप सुरू आहे. पण मराठी, बंगाली, पंजाबी या भाषा देखील राष्ट्रभाषाच असून हिंदी राष्ट्रभाषेचा पुरस्कार करणे मान्य नाही. तसा आग्रह धरल्यास दक्षिण व उत्तर भारत अशी दुसरी फाळणी होईल. दक्षिण भारतीय लोकांचा हिंदी भाषेला विरोध नाही. हिंदी लोकांच्या दादागिरीला विरोध आहे,’’ असे मत मावजो यांनी व्यक्त केले.

कोकणीलाही मराठीचा आधार

‘‘कोणतीही भाषा डबक्यात राहून मोठी होऊच शकत नाही. मी मराठीद्वेष्टा नाही. कोकणी भाषेला देखील मराठीचा आधार मिळत आहे. भाषेची श्रीमंती काय असते हे न कळणारेच लोक माझ्या नावाला विरोध करीत आहेत. कोकणी लेखक म्हणून नव्हे तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेता लेखक म्हणून मला उदगीर संमेलनाचे निमंत्रण असून गोवेकरांना याचा आनंद आहे,’’ असे मावजो म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com