पलूस - एसटी कर्मचाऱ्यांचा संप हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा करून संप मिटवण्याची गरज होती. ऐन दिवाळीत जनतेला त्रास झाला. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असे प्रतिपादन आमदार पतंगराव कदम यांनी पत्रकार परिषदेत केले.
कदम म्हणाले, 'परिवहनमंत्री दिवाकर रावते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कॉंग्रेसने चर्चेने सोडवले. सामान्यांसाठी एसटीची सेवा महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी शासनाची आहे.''
मोदी लाट ओसरली का? या प्रश्नावर ते म्हणाले, 'मोदी लाट पूर्णपणे ओसरली असे म्हणता येणार नाही. मात्र, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. लोकांच्या मनात कॉंग्रेस आहे. "जीएसटी', नोटाबंदी, महागाई यामुळे जनतेचे हाल होत आहेत. शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत.''
ते पुढे म्हणाले, की पंजाबमधील लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने लाखाचे मताधिक्य मिळवले. नांदेड महापालिकेत घवघवीत यश मिळवले. ग्रामपंचायतींत कॉंग्रेसने यश मिळवले. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. केंद्र व राज्यात कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल.''
|