पंढरपूर - राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढीवारीला किमान 10 लाख वारकरी उपस्थितीत राहतील, असा पोलिस प्रशासनाचा अंदाज आहे. यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मुंबई पोलिसांना आषाढी यात्रेसाठी पाचारण करण्यात आले आहे.
मुंबई पोलिस या वेळी प्रथमच विठ्ठलाच्या सेवेसाठी पंढरपुरात येणार आहेत. यामध्ये 25 सहायक पोलिस निरीक्षक, 175 पोलिस कर्मचारी सहभागी होणार आहेत. दरवर्षी आषाढीवारीसाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी व अधिकारी पंढरपुरात येतात. वाळवंट, विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मठ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा सलग तीन ते चार दिवस खडा पहारा देऊन भाविकांची काळजी घेतात.
|