पंढरपूर - 'जो माणूस राजकारणात समजूतदार असतो, त्याला पक्ष हितापेक्षा देशाची आणि राज्याच्या हिताची अधिक चिंता असते. अशी माणसे नेहमीच विचार करून बोलतात,'' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना अप्रत्यक्ष लगावला.
अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता.27) पंढरपूर येथे बोलताना "आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसची गरज नाही', असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे "राष्ट्रवादी'मध्ये चांगलेच पडसाद उमटले होते. सुप्रिया सुळे आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. दर्शनानंतर पत्रकारांनी चव्हाण यांनी "राष्ट्रवादी'बाबत केलेल्या विधानाकडे लक्ष वेधले असता. त्यांनी राजकारणी माणसांनी नेहमी समजूतदारपणे बोलावे, असा सल्ला दिला. विठ्ठल दरबारात येऊन दोन्ही नेत्यांनी केलेल्या या राजकीय विधानामुळे राजकीय निरीक्षकांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत.
खासदार सुळे म्हणाल्या, 'मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, असे राष्ट्रवादीची भूमिका सुरवातीपासूनची आहे. ती आजही कायम आहे. महिलांनादेखील समान न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून काम सुरू आहे. महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.''
सरकारच्या कर्जमाफी योजनेवर तुम्ही समाधानी आहात का, असे विचारले असता, सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अधिक अटी व नियम न लावता सुलभ पद्धतीने प्रक्रिया राबविण्याची गरज त्यांनी आहे.
मी कधीही कॉंग्रेसच्या विरोधात नाही!
राष्ट्रवादीची भूमिका ही पहिल्यापासून कॉंग्रेस सोबत जायची आहे; माझी तर सातत्याने आहे. मी आजपर्यंत कॉंग्रेसच्या विरोधात काहीही बोललेले नाही आणि यापुढेही बोलणार नाही; परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकारी पक्षाविषयी बोलताना समजूतदारपणे बोलावे, असेही त्यांनी सुनावले.
'एनडीए'त सहभाग नाही'
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होऊन सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा आहे. याबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. गेल्या साडेतीन वर्षांपासून माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. तसे काहीही घडणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
|