पंढरपूर - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी उडवाउडवीची उत्तरे दिली.
राणे यांच्याविषयी अधिक काही न बोलता त्यांनाच विचारा, असे विधान त्यांनी केले आहे. कॉंग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी पंढरपुरात राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल शनिवारी (ता.26) मौन बाळगले होते.
अशोक चव्हाण आज सकाळी श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल मला काहीच माहिती नाही. त्यांनाच या विषयी विचारा असे सांगून या विषयाला बगल दिली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील शक्ती मिलची जागा विकून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे वक्तव्य केले होते. याविषयी ते म्हणाले, की सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे राज्यात आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये असेच सरकारचे धोरण आहे. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत, पण एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपेक्षित सहकार्य मिळते का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की आम्ही राष्ट्रवादीवर अवलंबून नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही राज्यात सक्षम आहोत. विधानसभेत आणि बाहेरदेखील सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहोत. त्यांनाही आमच्या सोबत आंदोलनात यायचे असेल तर ते येतील.
|