पंढरपूर - डाऊ कंपनीच्या विरोधात वारकऱ्यांनी केलेलं आंदोलन, यापूर्वीच्या सरकारने चांगलेच अनुभवले आहे. विठ्ठल मंदिर समिती त्वरित बरखास्त करावी अन्यथा, यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आज येथे दिला. या आंदोलनामुळे भाविकांना मात्र त्रास सहन करावा लागला.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी, या मागणीसाठी आज मंदिरासमोरील महाद्वारात विविध वारकरी संघटनांनी सरकारच्या विरोधात भजनी आंदोलन केले. आंदोलनामध्ये राज्यभरातून वारकरी संघटनांचे प्रतिनिधी व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाचा भाविकांना त्रास !
आज श्रावणी एकादशी असल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यातच दुपारी नामदेव पायरी समोर वारकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे विठ्ठल मंदिराकडे येणारा रस्ता जाम झाला होता. रस्त्यावरच आंदोलन सुरू असल्यामुळे अनेक भाविकांना धक्काबुक्की सहन करत मंदिराकडे यावे लागत होते. या वेळी भाविकांनी आंदोलनाविषयी नाराजी व्यक्त केली.
|