मुंबई - नोटाबंदीसारखा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय हा एका रात्रीत घेतलेला नाही, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी लगावला. खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
प्लॅस्टिक बंदीवर बोलताना कदम म्हणाले की, "राज्यात सरसकट प्लॅस्टिक बंदी नाही. ज्या प्लॅस्टिकच्या वस्तू रोजच्या वापरातल्या आहेत, त्यांच्यावर बंदी नाही. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे सर्वसामान्यांनी स्वागत केले; मात्र, उत्पादकांचे नुकसान होत असल्यामुळे ते जाणीवपूर्वक टीका करत आहेत.
प्लॅस्टिक प्रदूषण वाढू लागल्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला. प्लॅस्टिक बंदीमुळे राज्यातल्या उत्पादकांचे नुकसान होत आहे हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. राज्यात 80% प्लॅस्टिक हे गुजरातमधून आयात होत आहे. या निर्णयात अनेकांनी हस्तक्षेप केला होता. प्लॅस्टिक बंदी होऊ नये असाही प्रयत्न झाला.''
प्लॅस्टिक उत्पादकांनी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कदम यांनी केला. प्लॅस्टिकमुळे मुंबई तुंबली. मुंबईच्या पुरात आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण, असा सवाल करत प्लॅस्टिक महत्त्वाचे की पर्यावरण, हा विचार आपल्याला करायला हवा, असे कदम यांनी स्पष्ट केले.
|