मुंबई - संभाजी ब्रिगेडमध्ये 25 वर्षे सामाजिक काम केल्यानंतर राजकीय पर्याय म्हणून शेतकरी कामगार पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सोमवारी स्पष्ट केले.
पुण्यात शनिवार वाड्यावर गुरुवारी (ता.12) होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात गायकवाड हे "शेकाप'मध्ये प्रवेश करणार आहेत. त्याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील हे या प्रसंगी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड ही सामाजिक चळवळ आहे. आम्ही सर्वच जण या चळवळीचे कार्यकर्ते आहोत; पण राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी शेकापची विचारधारा अधिक जवळची वाटते. शेतकरी व कामगार यांच्यासाठी काम करताना उपेक्षित व वंचित घटकांना न्याय हक्क मिळवून देण्याचा सतत प्रयत्न राहील, असे गायकवाड म्हणाले. संभाजी ब्रिगेड हा स्वतंत्र पक्ष असताना तुम्ही "शेकाप'मध्ये का गेलात, असे विचारले असता, कार्यकर्त्यांना प्रत्येकाला स्वत:चा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.
'मराठा मोर्चाबाबत आता बोलण्याचा मला अधिकार नाही. मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मी आता राजकीय पक्षाचा कार्यकर्ता झाल्याने मांडणे उचित नाही,'' असेही गायकवाड यांनी स्षष्ट केले.
|