पुणे - मॉन्सून परतल्याने विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान नगरमध्ये 12.7; तर पुण्यात 16.4 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.
दिवाळी संपताच राज्यात अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतेक ठिकाणी किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले आहे. रात्री उशिरा आणि पहाटे गारवा जाणवत आहे. परभणी, यवतमाळ, नगर येथे तापमानात तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसने; तर जळगाव, महाबळेश्वर, सोलापूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट होत आहे.
पावसाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता. 27) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. पुण्यातही येत्या दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज आहे.
|