तब्बल 14 जिल्हे कोरडे; सांगलीतही सरासरीपेक्षा कमी पाऊस
पुणे - पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मराठवाडा आणि विदर्भावरील दुष्काळाचे सावट पडत आहे. पावसाची सरासरी न ओलांडणाऱ्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या दहावरून 14 झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्यात मराठवाड्यातील आठपैकी सहा आणि विदर्भातील अकरापैकी सात जिल्हे कोरडे ठणठणीत आहेत. मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने बुधवारी दिली.
राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकण, घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भाग वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस थांबला आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत सरासरीच्या -59 ते -20 टक्के पाऊस पडलेल्या जिल्ह्यांची संख्या दहा होती.
ऑगस्टमध्येही पावसाने अद्याप जोर धरला नसल्याने ती संख्या दोन दिवसांमध्ये चारने वाढून 14 झाली आहे.
राज्यात आठ जूनला पाऊस सुरू झाल्यानंतर सुरवातीलाच पावसाने ओढ दिली होती. पण, जूनच्या शेवटी दमदार पाऊस झाल्याने पावसाळ्यातील पहिल्याच महिन्याची सरासरी पावसाने गाठली. जुलैमध्येही सुरवातीचे दहा-बारा दिवस पावसाने दडी मारली. मात्र, त्यानंतर पुन्हा दमदार पाऊस पडला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरीच्या 70 टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली.
तर पालघर, ठाणे, नगर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 20 ते 59 टक्के जास्त पाऊस पडला. पण, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे.
मराठवाड्यात दडी
दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला चांगला पाऊस पडला. मात्र, जुलैमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे निम्म्याहून अधिक मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार असल्याचे चित्र दिसत असल्याची निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. औरंगाबाद (-26), जालना (-27), परभणी (-40), हिंगोली (-25), नांदेड (-25), लातूर (-20) या जिल्ह्यांमध्ये तेथील सरासपेक्षा -59 ते -20 टक्के पाऊस झाला आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत -19 ते 19 टक्के म्हणजे सरासरीइतका पाऊस पडल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
विदर्भात ओढ कायम
विदर्भात यंदा मॉन्सून उशिरा पोचला. त्यामुळे जूनच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, त्यानंतर विदर्भातील 11 पैकी चार जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडला. पश्चिम विदर्भातील अमरावती (-26) आणि यवतमाळ (-27), अकोला (-22) तसेच पूर्व विदर्भातील भंडारा (-25) आणि गोंदिया (-27), नागपूर (-21), चंद्रपूर (-22) जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली. बुलडाणा, वाशीम, वर्धा, आणि गडचिरोली येथे सरासरी पावसाची नोंद झाली.
|