दहावीत १९३ विद्यार्थी ‘शतक’वीर

दहावीत १९३ विद्यार्थी ‘शतक’वीर

यंदाही मुलींची बाजी; सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल

पुणे - दहावीच्या परीक्षेत यंदा राज्यातील १९३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून इतिहास घडविला आहे, तर तब्बल ४८ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले अाहेत. ९८ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ३.२२ टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक ९७.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. यवतमाळचा निकाल सर्वांत कमी ७८.०३ टक्के लागला आहे.  

राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ०.८२ टक्‍क्‍यांनी घटला. उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी ९१.४६ असून, विद्यार्थ्यांपेक्षा ४.९५ टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मुलांची टक्केवारी ८६.५१ आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१८ टक्के आणि नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८३.६७ टक्के लागला.परंतु गेल्या वर्षी ३९७४ शाळांचा आणि यावर्षी ३६७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, सचिव कृष्णकुमार पाटील यांनी मंगळवारी (ता. १३) ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका २४ जून रोजी दुपारी तीन नंतर त्यांच्या शाळेत मिळतील. उद्या (ता. १४) पासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित (झेरॉक्‍स) प्रतींसाठी अर्ज करता येऊ शकेल. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून व उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्‍स प्रतींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै आहे. 

विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देता येते. जुलै-ऑगस्ट आणि मार्च २०१८ ला ते परीक्षा देऊ शकतील. मंडळाचे अध्यक्ष म्हमाणे म्हणाले, ‘‘दहावीचा निकाल उशिरा लागलेला नाही. महापालिकेच्या निवडणुकांमुळे सात मार्चला परीक्षा सुरू झाली. मागील वर्षी एक मार्चपासून परीक्षा घेण्यात आली होती. यापूर्वी १७ जून आणि २५ जूनला निकाल जाहीर झाला होता. या वेळी लवकर निकाल दिला.दहावीची फेरपरीक्षा १८ जुलैपासून घेण्यात येईल. १९ जूनपासून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. विद्यार्थ्यांना कलचाचणी अहवाल गुणपत्रिकेसोबत मिळेल.’’ 
 

अपयशी ठरलेल्यांनी निराश होऊ नये. ही परीक्षा म्हणजे शेवट नाही. पुरवणी परीक्षा आणि कौशल्यसेतूच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करण्याची पुन्हा संधी आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

३२ शाळांचा निकाल शून्य टक्के 

३५ टक्‍के गुण मिळविणारे विद्यार्थी १५३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com